उमा भारती पाऊल टाकण्याआधीच जिना सरकला!
संतापून स्थानक संचालकांकडे तक्रार
नागपूर : मुलूख मैदानी तोफ असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय मंत्री उमा भारती आज मंगळवारी प्रचारासाठी नागपुरात आल्या होत्या. भोपाळवरून रेल्वेने त्यांनी नागपूर गाठले. सभोवताल नेहमीसारखाच कार्यकर्त्यांचा गराडा होता. फलाटावरून पलीकडे उतरण्यासाठी त्या फिरत्या जिन्याजवळ आल्या. त्या जिन्यावर पहिले पाऊल ठेवणार तितक्यात अचानक जिना पुढे सरकला आणि पुढच्या अनर्थाच्या कल्पनेनेच त्यांच्या हृदयात धस्स झाले. या प्रकाराने संतापलेल्या उमा भारती यांनी याची तक्रार थेट स्थानक संचालकांकडे केली.
नागपुरात आज लोधी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात भाजपचा प्रचार करण्यासाठी उमा भारती नागपुरात आल्या होत्या, परंतु आल्याआल्याच त्यांच्यासोबत अशी घटना घडल्याने कार्यकर्तेही चिंतेत पडले. अखेर फिरत्या जिन्याऐवजी नेहमीच्या पायऱ्यांनी खाली उतरण्याचा निर्णय उमा भारती यांनी घेतला. परंतु जे घडले त्याचा राग काही त्यांच्या मनातून गेला नसावा. म्हणूनच त्यांनी नागपूर रेल्वेस्थानकाचे संचालक डी.एस. नागदेवे यांच्याकडे घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली. नागदेवे यांनी मात्र अशी कुठली तक्रार दाखल केल्याचा साफ इन्कार केला. ते म्हणाले, आम्ही उमा भारती यांचे स्वागत केले, ते त्यांनी स्वीकारले. मात्र, त्यांनी कुठलीही तक्रार केली नाही, असे त्यांनी सांगितले. परंतु हे प्रकरण इथेच संपले नाही. जिना सुरू का नव्हता आणि उमा भारती चढताच अचानाक जिना सुरू कसा झाला, यासंदर्भात चौकशी आदेश देण्यात येणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.