उद्याचे आंदोलनही शांततेच्या मार्गाने
पुणे – मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्ह्याच्या वतीने येत्या 9 ऑगस्ट (क्रांतीदिनी) रोजी जिल्हाधिकारी आणि तालुक्यातील तहसलीदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान शांततेत हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे पुणे जिल्हा समन्वयकांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, त्यादिवशी महाराष्ट्र बंदबाबत बुधवारी (दि. 8) औरंगाबाद येथे होणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याचे समन्वयकांनी स्पष्ट केले.
मराठा क्रांती (मूक) मोर्चाला येत्या 9 ऑगस्टला (क्रांतीदिनी) दोन वर्षे पूर्ण होत आहेत. आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने राज्यभर आंदोलने सुरू आहेत. मात्र, अत्तापर्यंत आश्वासनांपलीकडे समाजाला काहीही मिळालेले नाही. त्यामुळे 9 ऑगस्टला राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का न लागता शांततेच्या मार्गानेच या पुढील आंदोलने करण्यात येणार आहेत. परंतू, या आंदोलनामध्ये बाहेरील शक्ती घुसून आंदोलनाला हिंसक वळण देत आहेत. त्यामुळे आता “रास्ता रोको’ न करता ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाज बांधवांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे. कोणत्याही चुकीच्या मेसेजवर तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन समन्वयकांनी केले आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू राहणार आहे. तसेच आत्महत्या हा पर्याय नसून, तरूणांनी आत्महत्या करू नये, असे आवाहनही समन्वयकांनी केले. यावेळी राजेंद्र कोंढेरे, तुषार काकडे, उषा पाटील, स्वाती पवार, सचिन आडेकर, गणेश मापारी, अनिल लांडगे, राहूल पोकळे, दीपाली पाडळे, सुधीर कुरुमकर उपस्थित होते.