‘उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचा सरकारवर परिणाम नाही, उलट शिवसेनेची मतं वाढतील’
राम मंदिराचा मुद्दा न्यायप्रविष्ठ आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतरच मंदिर बांधायचं की नाही, किंवा ते कुठं बांधायचं हे निश्चित होणार आहे. मग उद्धव ठाकरेंचा अयोध्येत जाऊन फायदा काय? अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे.
आगामी निवडणुकीच्या आधी राम मंदिराचा मुद्दा ठळक करायचा हा यांचा प्रयत्न आहे. राज्यातील शिवसेना आणि भाजपा सरकारची सर्व अपयश झाकण्यासाठी त्यांना राम मंदिराचा मुद्दा सुचतोय. उद्धव ठाकरे हे भाजपाच्या आधी पहिल्यांदा तिथं जाऊन बोलले. याचा एकच फायदा होईल तो म्हणजे जर युती झाली नाही तर उत्तर प्रदेशात शिवसेनेची मतं वाढतील भाजपाची कमी होतील, असे मतही पाटील यांनी व्यक्त केले आहे.
उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया देणं ढोंग आहे. मुख्यमंत्री अशा प्रसंगी वेळ मारुन नेण्यात तरबेज आहेत. जर उद्धव यांना राम तुरुंगात आहे असं वाटतं असेल तर मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे प्रभू राम त्यांना अशिर्वाद कसे देतील? उद्धव यांच्या अयोध्या दौऱ्याचा राज्यातील आणि देशातील सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. उलट उद्धव ठाकरेंना दौरा करायचाच होता तर त्यांनी आधी सरकारमधून बाहेर पडून मग दौरा करायला हवा होता, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.