‘इस बार त्रिवेदी भी नहीं बचेगा’, सेक्रेड गेम्सचा उत्कंठा वाढवणारा दुसरा टीजर रिलीज
वेब सीरिजच्या विश्वास सध्या सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या भागाची सर्वात जास्त प्रतिक्षा आहे. पहिल्या सीजनमध्ये होते त्याचप्रमाणे दुसऱ्या भागातही अनेक ट्विस्ट आणि टर्न असणार आहेत. नव्या सीजनमध्ये नवे खेळाडू, नवे चेहरे दिसणार असून गणेश गायतोंडे म्हणजे नवाजुद्दीनही वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. पहिल्या भागात मुंबईला वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावणारा सरताज सिंग (सैफ अली खान) पुन्हा एकदा नव्याने कोडी उलगडताना दिसणार आहे.
पहिल्या सीजनमध्ये गणेश गायतोंडे हा सरताज सिंगला फोन करुन मुंबई वाचवण्यासाठी तुझ्याकडे फक्त २५ दिवस आहेत अशी चेतावणी देतो. त्रिवेदी सोडून कोणीही वाचणार नाही हा पहिल्या सीजनमधील मुख्य भाग होता. दरम्यान सिक्रेड गेम्सचा दुसरा टिझर रिलीज करण्यात आला असून यामध्ये यावेळी त्रिवेदीही वाचणार नाही असं सांगण्यात आलं आहे. यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा वाढली असून यावेळी काही अनपेक्षित गोष्टी पहायला मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
‘
पहिल्या टिजरमध्ये वेब सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. नेटफ्लिक्सच्या अधिकृत अकाऊंटवर ‘सेक्रेड गेम्स २’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून येत्या स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्ट रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘जंग का वक्त आ गया है’, म्हणत गणेश गायतोंडे पुन्हा एकदा सरताज सिंगला आव्हान देणार आहे.
पहिल्या भागामधील सैफ अली खान (दिलबाग सिंग), नवाजुद्दीन सिद्दीकी (गणेश गायतोंडे), जतीन सारना (बंटी), पंकज त्रिपाठी (गणेश गायतोंडेचा तिसरा अध्यात्मिक गुरु) हे कलाकार पुढच्या भागातही दिसणार आहेत. त्याचसोबत अभिनेत्री कल्की कोचलीन, अभिनेता रणवीर शौरी हे दोन नवीन कलाकारांची भर पडली आहे.
विक्रम चंद्रा यांच्या ‘सेक्रेड गेम्स’ या कांदबरीवर या वेब सीरिजचे कथानक आधारित आहे. या वेब सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकीनं साकारलेली गणेश गायतोंडेची भूमिका प्रेक्षकांनी उचलून धरली होती. ‘कभी कभी लगता है अपुनीच भगवान है’ म्हणणाऱ्या गणेश गायतोंडेचे यासारखे अनेक संवाद सोशल मीडियावर हिट ठरले. शिवीगाळ, खून मारामारी, अश्लिल संवाद आणि दृश्यानं भरलेली ही वेब सीरिज जितकी वादाच्या भोवऱ्यात सापडली तितकीच ती प्रसिद्धही झाली होती. त्यामुळे आता कल्की आणि रणवीरच्या आगमनाबरोबर सीरिजचे कथानक कोणते वळण घेते याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.