इम्रान खान यांनी पुढाकार घेऊन भारत-पाक क्रिकेट संबंध सुधारावेत – फारुख इंजिनीअर
भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज फारुख इंजिनीअर यांनी भारत-पाक क्रिकेट सामने पुन्हा एकदा सुरु व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. लंडनमध्ये एका खासगी कार्यक्रम बोलत असताना इंजिनीअर यांनी हे वक्तव्य केलं आहे. पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान यांनी आपल्या राजकीय पदाचा वापर करत दोन्ही देशांमधले क्रिकेट संबंध सुधारण्यासाठी हातभार लावावा असं इंजिनीअर म्हणाले. २००८ साली मुंबई अतिरेकी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात कोणत्याही प्रकारे द्विपक्षीय मालिका खेळवल्या जात नाहीयेत. दोन देशांच्या मालिकेत २००७ साली बंगळुरुत भारत-पाक शेवटचे समोरासमोर आले होते.
“इम्रान खान आता पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत. मला आशा आहे, दोन्ही देशांमध्ये क्रिकेट मालिका पुन्हा एकदा सुरु होतील. भारत-पाकिस्तान यांच्यात कसोटी क्रिकेट सुरु झाल्यास पाकिस्तान क्रिकेटलाही त्याचा फायदा होईल. मात्र भारतीय क्रिकेटसाठी याचे खूप दूरगामी सकारात्मक परिणाम होतील. त्याआधी दोन्ही देशांमध्ये संवाद सुरु होणं गरजेचं वाटतं. इम्रान खान आता आपल्या पदाचा वापर करुन हे काम करु शकतात.” इंजिनीअर यांनी आपलं मत मांडलं.
एक क्रिकेटपटू म्हणून मला भारत-पाक सामने पाहायला नक्की आवडतील. मात्र दोन्ही देशांमधील राजकीय नेत्यांनी यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे किंबहुना त्यांना ही कल्पना रुचली पाहिजे. भारत व पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये युवा खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे या संघांमध्ये होणारे सामने नेहमी रंगतदार होतात. २००९ साली श्रीलंकेच्या संघावर पाकिस्तानात अतिरेकी हल्ला झाला होता, यानंतर आयसीसीने कारवाई करत पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याला परवानगी नाकारली होती. यानंतर अनेक वर्षांच्या कालावधीनंतर पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं पुनरागमन झालं आहे. या काळात पाकिस्तानचा संघ आपल्या घरच्या मैदानातले सामने दुबई व अबुधाबीमध्ये खेळत होता.