इंडोनेशियात भूंकप-त्सुनामीमुळे आतापर्यंत 832 जणांचा मृत्यू
जकार्ता (इंडोनेशिया) – इंडोनेशियातील सुलावेसी बेटाला शुक्रवारी शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.5 एवढी होती. यानंतर आलेल्या त्सुनामीच्या तडाख्यामुळे आणि भूंकपामुळे आतापर्यंत 832 लोकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी सरकारी मीडियाने यासंबंधीची माहिती दिली.
दरम्यान या नैसर्गिक आपत्तीत 420 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त काल आले होते. मात्र त्यानंतर आता मृतांच्या संख्येत वाढ झाली असून रविवारी आलेल्या वृत्तांनुसार आतापर्यंत 832 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. तर 540 लोक जखमी आहेत.
इंडोनेशियाचे उपराष्ट्रपती जुसुफ कल्ला यांनी सांगितले की, मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता असून हा आकडा हजारांवर जाण्याची शक्यता आहे.
भूंकप आणि त्सुनामी यांमुळे पालू शहर सर्वात अधिक प्रभावित झाले आहे. याचा सुमारे साडे तीन लाख लोकांना फटका बसला आहे. या शहरात आपत्ती व्यवस्थापनाकडून बचाव व मदतीचे कार्य चालू असून या घटनेत बचावलेले लोकही त्यांना मदत करत आहेत.