इंग्लंडची फिरकी भारतापेक्षा सरस – टफनेल
लंडन: इंग्लंडने भारतीय संघाचा 2-1 असा पराभव करताना तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका जिंकली असून या विजयामुळे इंग्लंडच्या संघावर सर्व स्तरांमधून प्रशंसेचा वर्षाव होत आहे. त्याच वेळी इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांची कामगिरी भारतीय स्पिनरपेक्षा सरस होती, असा खळबळजनक दावा इंग्लंडचे माजी फिरकी गोलंदाज फिल टफनेल यांनी केला आहे.
एका घरगुती समारंभात बोलताना टफनेल म्हणाले की, आगामी कसोटी मालिकेच्या दृष्टीने भारतीय संघातील फिरकी गोलंदाजांमध्ये कुलदीप यादव हा महत्वपूर्ण गोलंदाज आहे, असे सांगून टफनेल म्हणाले की, भारतीय कसोटी संघात सध्या जागतिक दर्जाचे तीन फिरकी गोलंदाज आहेत. त्यात कुलदीप यादवचाही कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.
त्यामुळे कसोटी मालिकेसाठीचा भारतीय संघ आणखीन बळकट संघ बनला आहे. परंतु नुकत्याच पार पडलेल्या मालिकेत एकदिवसीय मालिकेत भारतीय संघातील फिरकीपटू कुलदीप यादव आणि युझवेंद्र चाहल यांच्यापेक्षा अदिल रशीद आणि मोईन अली हे इंग्लंडचे फिरकीपटू अधिक प्रभावी ठरले आहेत
टफनेल पुढे म्हणाला की, सध्या इंग्लंडच्या फलंदाजांनी यादवच्या गोलंदाजीचे कोडे सोडवले असून याचा प्रत्यय सर्वांना अंतिम सामन्यात आला होता. कारण त्या सामन्यात यादवला एकही बळी मिळाला नाही. त्यातच युझवेंद्र चाहलला तीन सामन्यांमध्ये मिळून केवळ दोनच बळी मिळवता आले असल्याने भारताचा फिरकी मारा आमच्या फलंदाजांनी निष्प्रभ केला आहे असेही तो म्हणाला.
टफनेल पुडे म्हणाला की, भारतीय उपखंडातील फलंदाज फिरकी गोलंदाजांचा सामना यशस्वी रित्या करतात मात्र या एकदीवसीय मालिकेत इंग्लंडच्या फिरकीपटूंनी भारतीय फलंदाजांना आपल्या तालावर नाचण्यास भाग पाडले आहे. रशीद आणि अलीने मिळून भारतीय फलंदाजांना चांगलेच बांधून ठेवले होते त्यामुळे भारताला धावा काढण्यात अपयश तर येतच होते, मात्र त्यांना या दोघांच्या गोलंदाजीवर खेळपट्टीवर टिकून राहणेही अवघड झाले होते. त्यातच खेळपट्टीही आमच्या गोलंदाजांना मदत करताना दिसून येत होती. असेही त्याने यावेळी नमूद केले.