आर्थिक गैरव्यवहार प्रकरण, कर्जबुडव्या विजय मल्ल्याने मांडली बाजू
नऊ हजार कोटींचे कर्ज थकवून देशाबाहेर पळालेला विजय मल्ल्याने आज त्याची बाजू मुंबईतील कोर्टात मांडली. विशेष न्यायालयाने विजय मल्ल्याला आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्याची बाजू मांडण्यासाठी ३ आठवड्याची मुदत दिली होती. आता याप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने विजय मल्ल्याला आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी फरार घोषित करावे अशी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर उत्तर देण्यासाठी विजय मल्ल्याने मुदत मागितली होती. ज्यानंतर कोर्टाने त्याला तीन आठवड्यांची मुदत दिली होती.
विजय मल्ल्याने एसबीआयसहित प्रमुख बँकांचे कर्ज बुडवून देशाबाहेर पोबारा केला आहे असा त्याच्यावर आरोप आहे. ही रक्कम ९ हजार कोटींच्या घरात आहे. सध्या विजय मल्ल्या लंडनमध्ये असून त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताचे कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्यार्पणासंदर्भातला खटला लंडन येथे सुरु आहे. विजय मल्ल्यावर हा खटला भारताच्या बाजूने सीबीआय आणि इडीनेच दाखल केला आहे.
काही दिवसांपूर्वीच विजय मल्ल्याने देश सोडण्यापूर्वी आपण अर्थमंत्री अरूण जेटलींची भेट घेतली होती असे म्हटले होते. ज्यानंतर काँग्रेसने अर्थमंत्री अरूण जेटली यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. विजय मल्ल्याने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे एकच खळबळ उडाली होती. विजय मल्ल्या खोटं बोलत असल्याचे अरूण जेटली यांनी म्हटले होते. तर विजय मल्ल्या हा देश सोडून पळाला ते अरूण जेटलींना ठाऊक होते त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी काँग्रेसने केली होती.