आयएसआयला भारताच्या पंतप्रधानपदी मोदीच हवेत – माजी अध्यक्षांचा दावा
इस्लामाबाद : पाकिस्तानात सध्या एका पुस्तकाने चांगलीच खळबळ माजली आहे. वेगवेगळे दावे करणाऱ्या या पुस्तकावर संपूर्ण पाकिस्तानात संतापाची लाट उसळली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली आजच चार वर्षे पूर्ण होत आहेत त्यामुळे यातील माहितीवर अधिकच चर्चा केली जात आहे. आयएसआयचे माजी डीजी असद दुरानी आणि रॉचे माजी प्रमुख ए.एस. दुलत यांनी भारत व पाकिस्तान यांच्या संबंधांवर स्पाय क्रॉनिकल हे पुस्तक लिहिले आहे.
या पुस्तकात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्याचा आयएसआयला आनंद झाला होता. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी राहिल्यास ते काहितरी मोठा निर्णय घेऊन खळबळ उडेल व त्याचा फायदा आपल्याला होईल अशी त्यांची धारणा होती. नरेंद्र मोदी या पदावरती राहिल्यास त्यांच्या निर्णयामुळे भारताच्या सेक्युलर प्रतिमेला धक्का पोहोचेल आणि त्याचा वैश्विक पातळीवर पाकिस्तानला फायदा होईल असे आयएसआयचे मत होते असे दुरानी यांनी या पुस्तकात मत मांडले आहे.
या पुस्तकामध्ये काश्मीर समस्या, कारगिल युद्ध, ओसामा बिन लादेनचा मृत्यू, कुलभूषण जाधव यांची अटक, हाफिज सईद, बुरहान वाणी अशा विविध मुद्द्यांवर लेखन करण्यात आले आहे. दुरानी यांनी 1998 साली भारतात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार आल्यावरही एक लेखन लिहिला होता. त्यामध्ये भारतात भाजपाचे सरकार आल्यामुळे पाकिस्तानने नाराज होण्याची गरज नाही असे म्हटले होते. दुरानी यांच्या पुस्तकावर पाकिस्तानात मोठी नाराजी पसरली आहे. ले. ज. असद दुरानी (निवृत्त) असद दुरानी यांना पाकिस्तानच्या लष्कर मुख्यालयात 28 मे 2018 रोजी बोलावण्यात आले आहे असे पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मे. ज. आसिफ गफूर यांनी ट्वीट केले आहे.