आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत – अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव.
नवी दिल्ली – संपूर्ण कर्जमाफी, शेतकऱ्यांसाठी पेन्शन, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी या तीन प्रमुख मागण्यासह विविध मागण्यांसाठी आज दिल्लीत हजारोच्या संख्येने शेतकरी दाखल झाले. मात्र दिल्लीच्या वेशीजवळ पोलीसांनी शेतकऱ्यांच्या किसान क्रांती पदयात्रेस रोखल्याने पोलीस आणि शेतकरी याच्यांत संघर्ष झाला. यामध्ये अनेक शेतकरी जखमी झाले.
शेतकऱ्यांचे आंदोलन पाहता दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी कलम 144 लावण्यात आले आहे. त्यानंतर सरकारविरोधी नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम्ही शेतकऱ्यांसोबत असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, ‘शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यास का रोखले जात आहे, हे चुकीचे आहे’. ‘आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत’.
तर दुसरीकडे युपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सुध्दा आम्ही शेतकऱ्यांसोबत असल्याचे सांगत शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की, ‘शेतकऱ्यांना दिली गेलेली आश्वासन पूर्ण करण्यास सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे शेतकरी सरकारचा विरोध करणारच’. ‘आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत’.