आठ दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत होईल; महापौर राहूल जाधव यांचे आश्वासन
पिंपरी (महा ई न्यूज) – शहरातील पाणी टंचाईबाबत बैठकीत उपस्थित नगरसेवकांच्या समस्या जाणून घेतल्या असून संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना पाणी पुरवठा विभागातील अधिका-यांना दिल्या आहेत. आठ दिवसांची मुदत त्यांनी मागितली आहे. त्यांना मुदत दिली असून त्यानंतर कामात काही अडचणी आल्यास त्याही दूर केल्या जातील. तरीही, पाणी टंचाई कायम राहिल्यास त्यापुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती महापौर राहूल जाधव यांनी सांगितली.
शहराला पाणी पुरवठा करणा-या पवना धरणात मुबलक पाणी असताना पिंपरी-चिंचवड शहरामधील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यासंदर्भात नागरिक प्रभागाच्या नगरसेवकांकडे तक्रार करत असल्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांची आणि पाणी पुरवठा विभागाची बैठक आज शनिवारी (दि. 29) घेण्यात आली. बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील पाण्याशी संबंधित प्रश्न मांडले. त्यावर पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता प्रविण लडकत, विशाल कांबळे आणि रामदास तांबे यांनी उत्तरे दिली.
काही भागामध्ये कमी प्रमाणात पाणी पुरवठा होतो. तर, काही प्रमाणात दुषीत पाणी पुरवठा होतो. तसेच, बेकायदेशीर नळजोड, पाणी गळती आदींबाबत नगरसेवकांनी प्रश्न मांडले. त्यावर रामदास तांबे यांनी उत्तरे दिली. प्रशासनाने पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आठ दिवसांची मुदत मागितली आहे. त्यांना मुदत दिली असून आठ दिवसांनंतर टंचाई भासल्यास कार्यवाही केली जाईल, अशी माहिती महापौर जाधव यांनी दिली.