breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
आकुर्डीत टाळ-मृदंगाच्या गजरात “ज्ञानोबाऽ तुकारामऽऽ’चा जयघोष
आकुर्डी – हलक्या पावसाच्या सरींच्या साक्षीने आकुर्डीच्या विठ्ठल मंदिरात शुक्रवारी संध्याकाळी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात टाळ-मृदंगाच्या गजरात “ज्ञानोबाऽ तुकारामऽऽ’चा जयघोष झाला.
देहूच्या इनामदार वाड्यातून प्रस्थान झालेला संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आकुर्डीच्या विठ्ठल मंदिरात सायंकाळी 6 वाजता विसावला. त्यानंतर विठ्ठलाच्या भक्तीने तल्लीने झालेले वारकरी, टाळकरी, विणेक-यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात “ज्ञानोबाऽ तुकारामऽऽ’चा जयघोष सुरू केला. पावसाच्या हलक्याशा सरी आकाशातून कोसळताना पालखी रथातून उतरवून मंदिरात नेण्यात आली. त्यानंतर समाज आरती झाली. यावेळी देहू संस्थानचे अध्यक्ष, सोहळा प्रमुख व विश्वस्तांतर्फे उपस्थित हजारो भाविक उपस्थित होते.
विठ्ठल मंदिर परिसरात शहरातील नागरिकांनी सकाळपासून गर्दी करुन पालखीचे दर्शन घेतले. सकाळी लवकरच पालखीचा पुण्याकडे विठू नामाचा गजर करीत प्रस्थान सुरु झाले.
सायंकाळी शहरातील अनेक भजनी मंडळांनी मंदिरात कीर्तनाचे आयोजन केले होते. मंदिराच्या परिसराला दुपारपासूनच जत्रेचे स्वरूप आले होते. आवारात आकर्षक रांगोळी काढलेली होती. प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकाने फ्लॅस्टिकमुक्त वारी, झाडे लावा, प्रदूषण टाळा, प्लॅस्टिकबंदीचे फायदे या विषयांवर पथनाट्ये सादर केली. मंदिर परिसरातील कचरा विद्यार्थ्यांनी गोळा करुन स्वच्छता केली.