आंबेडकरवादी संघटनांनी नक्षलवाद्यांच्या षडयंत्रापासून सावध रहावे – खासदार अमर साबळे
पिंपरी – कोरेगाव भीमा दंगलीचा तपास आयोग पातळीवर सुरु आहे. दलित संघटनावर पोलिसांकडून कोणतीही कारवाई झाली नाही. तरीसुद्धा दलित संघटनांना त्यांच्यामध्ये ओढून सामाजिक अराजकता निर्माण करण्याचे नक्षलवाद्यांचे षडयंत्र आहे. याच्यापासून आंबेडकरवादी समाज व संघटनांनी सावध राहावे, असे आवाहन राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी पत्रकार परिषदेत केले.
खासदार साबळे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी 2013 मध्यें सांगितले होते की, नक्षलवादी हे देशाचे खरे मित्र आहेत. नक्षलवादी नेते मिलिंद तेलतुंबडे हे प्रकाश आंबेडकर यांचे जवळचे नातेवाईक आहेत. त्यांच्यावर सरकारने 50 लाखांचे बक्षीस ठेवले आहे. मिलिंद तेलतुंबडे याने लिहिलेला पत्रव्यवहार समोर आला असून त्यामध्ये प्रकाश आंबेडकरांमुळे भविष्यात दलितांचे समर्थन आपल्या नक्षलवादी चळवळीला मिळेल, असे त्यात म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असताना बाबासाहेबांनी आखून दिलेल्या मार्गावर मार्गक्रमण करण्याऐवजी प्रकाश आंबेडकर हे भरकटले आहेत, आणि त्यांनी नक्षलवादी चळवळीला समर्थन दिल्याने त्यांच्यापासून आंबेडकरवादी व पुरोगामी समाजाने सावध राहिले पाहिजे. नक्षलवाद्यांकडून भविष्यात घातपात होण्याची शक्यता आहे. असा घातपात झाला तर समाजावर दूरगामी परिणाम होऊ शकतो, असेही साबळे म्हणाले.