आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीचे नाटक करू नका!
भारताचा पाकिस्तानला इशारा
लाहोर/द हेग : भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधवप्रकरणी पाकिस्तान कोणती कृती करीत आहे त्याकडे भारताचे बारकाईने लक्ष आहे आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा दावा केल्याचे पाकिस्तानने नाटक केल्यास त्यावर उपाय योजण्यासाठी आम्ही पुन्हा आयसीजेमध्ये अथवा संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेकडे दाद मागू, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे.
पाकिस्तानने आयसीजेच्या आदेशाची पूर्णपणे अंमलबजावणी केली नाही तर काय, असे विचारले असताना ज्येष्ठ वकील हरीश साळवे म्हणाले की, जर आदेशाचे उल्लंघन करण्यात आले तर पाकिस्तानला अधिक सूचना देण्यासाठी आपण पुन्हा आयसीजेमध्ये दाद मागू शकतो, पाकिस्तानने आदेशांचे जाणूनबुजून उल्लंघन केले तर संयुक्त राष्ट्रांमध्ये निर्बंध घालण्यासह अन्य अनेक तरतुदी आहेत, असेही ते म्हणाले.
पाकिस्तान आदेशाचे उल्लंघन करणार नाही याची आपल्याला खात्री आहे, त्यांच्यावर बारकाईने लक्ष आहे, पाकिस्तानने नाटक केल्यास ते निदर्शनास येईलच, एखाद्या देशाने वाईट वर्तणूक करण्याचे ठरविलेच तर इतर पर्याय उपलब्ध आहेत, असेही साळवे म्हणाले.
निकाल भारताच्या भूमिकेचे समर्थन करणाराच
नवी दिल्ली : भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधवप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) दिलेला निकाल भारताने घेतलेल्या भूमिकेचे पूर्ण समर्थन करणारा आहे, असे गुरुवारी भारताने म्हटले आहे. इतकेच नव्हे तर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास पाकिस्तान बांधील असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. आयसीजेचा निकाल अंतिम, बंधनकारक आणि अपिलाची तरतूद नसलेला आहे. आयसीजेमध्ये पाकिस्तानचा विजय झाल्याचा दावा करण्यात येत आहे, त्याबद्दल विचारले असता परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार म्हणाले की, पाकिस्तानला जनतेसमोर खोटे बोलण्याशिवाय अन्य पर्याय नाही.