पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या वाराणसी मतदार संघात अस्वच्छतेविरोधात ‘राम-लक्ष्मण’चे आंदोलन
वाराणसी – सत्तेत आल्यानंतर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियान’ची सुरूवात केली. पण पंतप्रधानांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील अस्वच्छतेमुळे ‘रामलीला’ करणाऱ्या ‘राम-लक्ष्मण’ यांना उलटीचा त्रास झाला. त्यानंतर रामलीलाच्या आयोजकांसह राम-लक्ष्मण यांनी स्टेजवरच आंदोलनाला सुरूवात केली. राम-लक्ष्मण यांच्या आंदोलनाची बातमी कळताच प्रशासकीय अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. त्यांनंतर संबंधीत अधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन स्वच्छतेचे अश्वासन देऊन प्रकरण शांत केले.
वाराणसी येथील धनेसका तलावावर शनिवारी रामलीलातील ‘शूर्पणखा आख्यान’ होणार होते. यासाठी राम आणि लक्ष्मण या ठिकाणी पोहचले. तेथील दुर्गंधीमुळे रामलीलामधील दोन्ही पात्रे राम आणि लक्ष्मण यांना उटल्याचा त्रास सुरू झाला. आयोजकांनी रामलीला बंद करत राम आणि लक्ष्मणाच्या साथीने आंदोलनाला सुरूवात केली. त्यानंतर रामलीला पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनीही अस्वच्छतेविरोधात आवाज उठवला आणि आंदोलनात सहभागी झाले. हा सर्व प्रकार ज्यावेळी प्रशासकिय अधिकाऱ्यांना समजला, त्यावेळी त्यांचा गोंधळ उडाला. आयुक्त अजय कुमार सिंह आणि एसडीएम विनय कुमार सिंह आंदोलनाच्या ठिकाणी पोहचले आणि रविवारी सर्व तलाव साफ करण्याचे आश्वासन दिले.
‘१५४५ पासून धनसरा तलावावर रामलीला होत आली आहे. स्थानिक प्रशासन या पंरपरेला बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच आम्ही वारंवार सुचना करूनही तलावाची स्वच्छता झाली नाही, आणि येथील आतिक्रमण हटवण्यात आले नाही.’ अशी माहिती राजाराम पांडे यांनी दिली.