अलीगढ हत्या: चिमुरडीच्या कुटुंबीयांना न्याय द्या, राहुल आणि प्रियंका गांधींची मागणी
उत्तरप्रदेशातल्या अलीगढमध्ये एका दाम्पत्याने १० हजारांचे कर्ज न फेडल्याने दोन जणांनी या दाम्पत्याच्या अडीच वर्षांच्या मुलीची क्रूर हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि उत्तर प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी न्याय दिला जावा अशी मागणी केली आहे. या दोघांनीही ट्विट करून या चिमुरडीला न्याय द्या अशी मागणी केली आहे.
काय म्हटले आहे प्रियंका गांधी यांनी ?
अलीगढमध्ये जी घटना घडली ती अमानवी आणि क्रौर्याचा कळस गाठणारी घटना आहे. आपण हा कसा समाज तयार करतो आहोत? त्या मुलीच्या आई वडिलांना आता काय वाटत असेल याचा विचार केला तरीही अंगावर काटा येतो. जे अपराधी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी प्रियंका गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.
काय आहे राहुल गांधी यांचा ट्विट?
अलीगढमध्ये घडलेली घटना ही अत्यंत धक्कादायक आहे. या घटनेमुळे मी विचलित झालो आहे. एखाद्या लहान मुलीची इतकी क्रौर्याने हत्या करायला माणसांचे हात कसे काय धजावतात? ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. या प्रकरणी न्याय झालाच पाहिजे अशा आशयाचं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.
काय आहे प्रकरण?
अलीगढमधील टप्पल परिसरात राहणारी अडीच वर्षांची मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. २ जून रोजी तिचा मृतदेह गावाबाहेरील कचराकुंडीजवळ सापडला होता. हत्या करणाऱ्यांनी मुलीचा चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न देखील केला होता. गावातील भटके कुत्रे एका लहान मुलीच्या मृतदेहाचे लचके तोडत असल्याचे ग्रामस्थाने बघितले आणि या घटनेची माहिती त्याने पोलिसांना दिली. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला होता.