अलिबागमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा आत्महत्येचा प्रयत्न
- शितपेयातून विष घेतल्याचा संशय
- दोन लहान मुलांची प्रकृती चिंताजनक
अलिबाग – दिल्लीतील सामुहिक आत्महत्येनंतर आज अलिबागमधील प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. आक्षी येथे एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या पाचही जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील दोन लहान मुलांची प्रकृती चिंताजनक आहे.
रामचंद्र पाटील (वय 60), रंजना पाटील (वय 50), कविता राहुल पाटील (वय 25), स्वराली पाटील (दीड वर्षे) आणि स्वराज पाटील (दीड वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. यातील स्वराली आणि स्वराज या दोघांची प्रकृती गंभीर असून दोघांनाही मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
त्यांनी शितपेयातून विष घेतल्याचा संशय आहे. आजी- आजोबा, मुलाची पत्नी आणि त्याची दीड वर्षांची जुळी मुले अशा पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलगा हा मुंबईत नोकरीला असून हे वृत्त समजताच तो अलिबागला रवाना झाला आहे. चौघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी ते बेशुद्धावस्थेत होते. कौटुंबिक वादातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असे समजते. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.