अयोध्येत भव्य राम मंदिर बांधणारच – देवेंद्र फडणवीस
निवडणुकीच्या काळात भाजपाचे नेते भगवान रामाचा वापर का करतात असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करतानाच भगवान राम हे फक्त भाजपाचे नाहीत तर ते संपूर्ण विश्वाचे भगवान आहेत असे उद्गार काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी काढले. एका कार्यक्रमात दिल्लीमध्ये फडणवीसांना त्यांनी हा प्रश्न विचारला.
अब्दुल्ला म्हणाले की, “भगनाव रामाच्या नावावरून व राम मंदिरावरून भाजपा मतांचं ध्रुवीकरण करतं. हे चुकीचं असून भगवान राम काही फकर्त भाजपाचेच नाहीत तर आमचे पण आहेत, सगळ्यांचेच आहेत. भाजपानं मतांसाठी हे राजकारण बंद करावं.” फडणवीसांनी या प्रश्नावर उत्तर देताना आम्ही मतांच्या राजकारणासाठी भगवान रामाचा वापर करत नसल्याचे सांगितले. राम मंदिर हा विषय आमच्यासाठी पोलरायझेशनचा नसून कन्व्हिक्शनचा असल्याचे सांगितले.
“या प्रश्नावर ज्या ज्यावेळी आमचं मत विचारलं जाईल त्या त्या वेळी आम्ही बोलणारच. सातशे वर्षांपूर्वी बाहेरच्या देशातील आक्रमकांनी मंदिर पाडल्याचं आमचं मत असून भव्य राम मंदिर झालंच पाहिजे. परंतु मशिदी पाडण्याच्या आपण विरोधात असून लोकशाही मार्गाने मंदिर बांधायला पाहिजे,” फडणवीस म्हणाले.
आपण मशिदी पाडायच्या विरोधात आहोत एवढंच नव्हे तर कुणी मशिदी पाडत असेल तर आपण त्याला प्राणपणानं विरोध करू असं फडणवीस म्हणाले. मात्र, अयोध्येत ६ डिसेंबर १९९२ रोजी राम मंदिर झालंच आहे, आता ते फक्त भव्य करायचा प्रश्न आहे आणि ते आम्ही बांधणारच असे ते म्हणाले.