अतिरेक्यांना हिंसाचारापासून दूर करण्यासाठी त्यांच्या कुटुंबांना पोलीसप्रमुखांचे साकडे
श्रीनगर : तुमच्या मुलांना हिंसाचार सोडून देण्यासाठी समजवा, त्यांना मुख्य प्रवाहात येण्यास सांगा, असे आवाहन जम्मू-काश्मीरचे पोलीसप्रमुख एस. पी. वैद यांनी काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना केले आहे. हिंसाचार सोडल्यास त्यांचे सरकार पुनर्वसन करेल आणि त्यांना सर्व प्रकारची मदतही केली जाईल, असेही वैद यांनी म्हटले आहे.
पोलीसप्रमुख वैद यांनी एका टष्ट्वीटद्वारे हे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की, आज मी कुटुंबीयांना पुन्हा एकदा आवाहन करतो की, त्यांनी चुकीच्या मार्गावर गेलेल्या आपल्या मुलांना हिंसाचाराचा मार्ग सोडून घरी परत येण्यास सांगावे. जे तरुण हिंसाचाराचा, दहशतवादाचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात परततील, त्यांना जम्मू-काश्मीरचे पोलीस सर्व प्रकारचे साह्य करतील.
कोणाचीही जीवितहानी पाहणे हे अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असते. दहशतवादामुळे राज्याचे तर नुकसान होतच आहे, पण त्याहून अधिक त्यांचे स्वत:चे व कुटुंबांचे अधिक नुकसान होत आहे. दहशतवादाकडे वळलेल्या या तरुणांना आपली स्वत:ची कसलीच शाश्वती नाही, हे कुटुंबीयांनी समजावून सांगावे. जम्मू-काश्मीरचे पोलीस त्यांना पुनर्वसनासह सर्व प्रकारचे साह्य करतील, याचे मी वचन देतो, असे पोलीसप्रमुखांनी म्हटले आहे.