अटलजींवरील प्रेमापोटी राजकारणात प्रवेश केला- धर्मेंद्र
भारताचे माजी पंतप्रधान, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी ओळख असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सुन्न झालेला प्रत्येक सेलिब्रेटी आणि राजकारणी त्यांना आदरांजली वाहत आहेत.तर काही जण त्यांच्या आठवणींना उजाळाही देत आहे. यातच अभिनेता धर्मेंद्र याने त्यांच्या आठवणींना उजाळा देत अटलजी त्याचे प्रेरणास्थान असल्याचं म्हटलं आहे.
मुत्सद्दी नेता, उत्तम राजकारणी आणि कायम समाजसेवेसाठी तत्पर असलेले अटलजी अनेकांचे प्रेरणास्थान होते. राजकारणामध्ये त्यांचा असलेला वावर आणि निर्णय घेण्याची पद्धत पाहुन धर्मेंद्रने राजकारणात प्रवेश केल्याचं नुकतंच सांगितलं आहे.
‘निर्भीड, साहसी आणि प्रामाणिकपणाची कास धरणारे अटलजी यांनी देशावर कायम प्रेम केलं. देशातील प्रत्येक नागरिकाने बंधूभाव जपत एकमेकांची साथ द्यावी असं अटली यांना कायम वाटत होतं.त्यांच्या याच स्वभावामुळे ते भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बिघडलेले संबंधही सुधारण्याचा प्रयत्न करत होते. मी जेव्हा जेव्हा त्यांची भेट घ्यायचो तेव्हा त्यांना पाहून अचंबित व्हायचो. त्यांच्यासमोर बोलण्याची माझी हिंमत होत नसे. त्यांनी फक्त बोलावं आणि मी ऐकत राहावं असंच मला वाटायचं’, असं धर्मेंद्रने सांगितलं.
पुढे ते असंही म्हणाले, ‘अटलजी यांच्या निधनाचं वृत्त ऐकून मला प्रचंड धक्का बसला. त्यांचं स्थान माझ्यासाठी एखाद्या अमुल्य वस्तूसारखं होतं. मी राजकारणात प्रवेशदेखील त्यांच्यामुळे केला होता. त्यांचा आदर्श मी कायम डोळ्यासमोर ठेवला आणि राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मी पहिल्यांदाच राजकारणात जाण्याचं ठरवलं तेव्हा त्यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये त्यांनी मला अलिंगन देऊन माझं अभिनंदन केलं होतं. त्यामुळे त्यांची ही आठवण विसरणं कदापि शक्य नाही’.
दरम्यान, अटलीजी यांच्या निधनानंतर बॉलिवूड असो किंवा छोट्या पडद्यावरील कलाकार प्रत्येक जण त्यांना मनापासून आदरांजली अर्पण करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन देत आहे.