अंतराळात भारताचे सामर्थ्य वाढणार; इस्रो ५ सैन्य उपग्रह सोडण्याच्या तयारीत
अंतराळात भारताचे लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) या वर्षात पाच लष्करी उपग्रह अंतराळात पाठवणार आहे. याची तयारीही सुरु झाली असून नुकतेच दोन टेहळणी उपग्रह अवकाशात सोडून या कार्यक्रमाचा इस्रोने शुभारंभ केला आहे. या उपग्रहांमुळे सुरक्षा रक्षकांची निरिक्षण क्षमतेत वाढ होणार आहे. त्यासाठी आणखी अत्याधुनिक सैन्य उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहेत.
या योजनेनुसार, इस्रो नव्या मालिकेतील चार रिसॅट उपग्रह आणि एक अॅडव्हान्स कार्टोसॅट-३ उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे. हे भारतीय सैन्यासाठी मोलाची कामगिरी बजावू शकतात. २०१६ मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) भारताने सर्जिकल स्ट्राइक केले होते. तसेच या वर्षी पाकिस्तानातील बालाकोटमध्ये दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करण्यापूर्वी भारताच्या जुन्या रिसॅट मालिकेतील उपग्रहांनी पाठवलेल्या छायाचित्रांचा वापर करण्यात आला होता.
यापूर्वी इस्रोकडून एका वर्षात एक किंवा दोन सैन्य उपग्रह अंतराळात पाठवले जात होते. मात्र, पाकिस्तानकडून सातत्याने सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण केले जात असल्याने तसेच हिंदी महासागरात चिनी नौदलाच्या हालचालींमध्ये झालेली वाढ यामुळे इस्रोचा दृष्टीकोन बदलला असून आता इस्रोने आपले संपूर्ण लक्ष्य अंतराळात भारताला सक्षम बनवण्यावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी म्हटले आहे की, आम्ही यंदा उपग्रह आणि रॉकेट्स मिळून ३३ मोहिमा पार पाडण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
सिवन यांनी सांगितले की, जुलैमध्ये रिसॅट-2BR1, ऑक्टोबरमध्ये रिसॅट-2BR2, नोव्हेंबरमध्ये रिसॅट-2B लॉन्च करण्यात येणार आहे. रिसॅट-2B मालिका ही गुप्त उपग्रहांचे सूक्ष्म स्वरुप आहे. यामध्ये एक्स-बँड सिंथेटिक अपर्चर रडार बसवण्यात आले आहेत. हे रडार ढगांच्या पलिकडीलही छायाचित्रे घेऊ शकतात. तसेच या छायाचित्रांना १ मीटर रिझॉल्युशनपर्यंत झूम करु शकतात.