सरकार भाजपचे पण कामे आमदारांचीच
सातारा– राज्यात भाजपचे सरकार असले तरी सातारा-जावली मतदारसंघात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून विकासकामे होत आहेत. आमचे सरकार म्हणून हे मी केले आणि तेही मीच केले, असा ढोल बडवून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न दीपक पवारयांनी थांबवावा, अशी टिका जावली पंचायत समितीचे उपसभापती दत्ता गावडे यांनी केली आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात गावडे यांनी म्हटले आहे की, कोणत्याही पक्षात थारा आणि किंमत मिळत नसल्याने दीपक पवार बेडूक उड्या मारण्यात तरबेज झाले आहेत. गतविधानसभा निवडणुकीत पराभूत झाला तरी, केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्याने आमदारांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा- जावली मतदारसंघात आमदार फंड, राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून करोडो रुपयांची विकासकामे मार्गी लावली आहेत. यामुळे जनतेची त्यांची नाळ घट्ट झाली आहे.पवार यांनी कितीही ढोल बडवला तरी, कामे आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यामुळेच मार्गी लागत आहेत हे प्रत्येक गावातील ग्रामस्थांना माहिती आहे असे पत्रकात म्हटले आहे.
सातारा- जावली मतदारसंघात आ. शिवेंद्रराजे यांच्यापुढे कोणाचाही निभाव लागणार नाही, याचीपुरती खात्री भाजपच्या मंत्र्यांना झाली आहे. याची प्रचितीही दीपक पवारांच्या सातारा येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटन कार्यक्रमात सर्वांना आली . ना. चंद्रकांत पाटील यांनी आ. शिवेंद्रराजे यांच्या कार्याचे जाहीर कौतूक केले . ज्या आमदारकीसाठी दीपक पवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते, ते बाशिंगच ना. पाटील यांनी हिसकावून घेतले. त्यामुळे सातारा- जावली विधानसभेसाठी योग्यवेळी उमेदवार जाहीर करु, असे स्पष्ट करुन ना. पाटील यांनी तुमच्याच कार्यक्रमात तुमचेच तिकीट कापले होते, हे पवार विसरले का असा प्रश्न पत्रकात विचारला आहे. राज्यातील सत्तेचा फायदा घेवून स्वत:च्या गटात एखादे काम करुन दाखवा असे आव्हानही पत्रकातून देण्यात आले आहे.