यापुढे मराठा आंदोलन रस्त्यावर नाही; समन्वयकांची घोषणा
पुणे – मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी यापुढे रस्त्यावर कोणतेही आंदोलन न करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा मोर्चाच्या वतीने घेण्यात आला आहे. रस्त्यावरच्या आंदोलनांमधून महाराष्ट्राचे होणारे अपरिमित नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे मोर्चाचे समन्वयकांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
मोर्चाच्या वतीने गुरुवारी (9 ऑगस्ट) क्रांतिदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या ठिय्या आंदोलनानंतर झालेल्या प्रकाराने गालबोट लागले. त्यातून समाजाची बदनामी होत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर, विकास पासलकर, बाळासाहेब अमराळे आणि सचिन आडेकर यांनी ही माहिती दिली.
”पंधरा ऑगस्टपर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्या दिवशी आत्मक्लेष आंदोलन करण्यात येणार आहे. मराठ्यांच्या घरोघरी चूल बंद आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच यापुढे रास्ता रोको, रेल रोको यासारखी समाजाला वेठीला धरणारी व सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्या आंदोलनाऐवजी जिल्हा-तालुका स्तरावर साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला”, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. राज्य समन्वय समितीच्या बैठकीत हीच भूमिका मांडण्यात येणार आहे.