मोदींच्या पराभवाची चर्चा चहा टपरीवर होईल: खासदार राजू शेट्टी
बुलडाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला गांधीवादी आणि लोकशाहीचे पुजारी असल्याचा आव आणतात. मोदींना एवढी लोकशाहीविषयी आस्था वाटत असल्यास त्यांनी शेतकरी प्रश्नांसाठी विशेष अधिवेशन बोलवावे. अन्यथा चहाचे भांडवल करून लोकांना फसविणाऱ्या मोदी यांचा पराभव का झाला याची चर्चा चहाच्या टपरीवर करताना दिसतील, असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी लगावला.
धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या वखरण गावावरून निघालेली शेतकरी सन्मान यात्रा शनिवारी सायंकाळी देऊळगाव महीत पोहचली. यानिमित्त झालेल्या जाहीर सभेत शेट्टी बोलत होते. व्यासपिठावर माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, कवी ज्ञानेश वाकुडकर, युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडगुले, महिला प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख घनशाम चौधरी, मराठवाडा प्रमुख माणिकराव कदम, मराठवाडा कार्यध्यक्ष गजानन बंगाळे पाटील, स्वाभिमानी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सयाजी मोरे, स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अमोल हिप्परगे, राज्य प्रवक्ते अनिल पवार, स्वाभिमानीच्या राज्य उपाध्यक्षा शर्मीला येवले उपस्थित होते. खा. शेट्टी म्हणाले, पेट्रोलचे भाव वाढले, शेतीची औजारे, खते, बियाण्याचे भाव आकाशाल भिडले. मात्र आम्ही उत्पादित केलेल्या वस्तूचे भाव कमी होतात. सरकारचे आयात धोरण हे शेतकऱ्यांना मारक ठरत असल्याने शेतकरी देशोधडीला लागला. सरकारने स्वामिनाथन आयोगाची शिफारस स्वीकारली असती तर वेतन आयोगाप्रमाणे सरकारला फरक द्यावा लागला असता, असेही त्यांनी सांगितले.