मुंबई विमानतळावर ऐन दिवाळीत प्रवाशांचा खोळंबा, एअर इंडियाचे कर्मचारी संपावर
दिवाळी बोनस न दिल्याने एअर इंडियाचे ४०० कर्मचारी बुधवारी रात्रीपासून संपावर गेले आहेत. सर्व कर्मचारी हे ग्राऊंड स्टाफ असून संपामुळे विमानतळावरील प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. ‘चेक इन’साठी लांबच लांब रांगा असून अनेक विमानांचे उड्डाण हे उशिराने सुरु आहे.
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस लिमिटेड अंतर्गत ग्राऊंड स्टाफचा समावेश होतो. चेक इन, सामान विमानात ठेवणे, विमानाची साफसफाई, कार्गो याची जबाबदारी ग्राऊंड स्टाफकडे असते. एअर इंडियाच्या ग्राऊंड स्टाफसोबत काही परदेशी विमान कंपन्यांचाही करार आहे. मुंबई विमानतळावरील सुमारे ४०० कर्मचारी बुधवारी रात्रीपासून संपावर गेले आहेत. दिवाळीचा बोनस न दिल्याने कर्मचारी आक्रमक झाले असून या संपामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होत आहेत.
चेक इन काऊंटर्स बंद असल्याने प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रवाशांची गैरसोय होत असून एअर इंडियाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची तक्रार प्रवासी करत आहेत. या संपाबाबत एअर इंडियाच्या वतीने अद्याप प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. संपामुळे अनेक विमानांचे उड्डाण उशिराने सुरु आहे.