महिला आयोगाने “भारत असुरक्षित’ अहवाल फेटाळला
नवी दिल्ली – महिलांसाठी भारत हा सर्वात असुरक्षित देश आहे, असा निष्कर्श काढणारा सर्वेक्षणाचा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगाने फेटाळला आहे. भारतानंतर क्रमवारी लागलेल्या देशांमध्ये महिलांना सार्वजनिक ठिकाणी बोलायचीही परवानगी नाही, असेही आयोगाने म्हटले आहे.
“द थॉमसन रॉयटर्स फौंडेशन’ने जगभरातील 550 तज्ञांकडे महिलांच्या विषयांसंबंधी सर्वेक्षण केले होते. त्याच्या आधारे भारत हा जगभरात महिलांसाठी सर्वात असुरक्षित देश असल्याचा निष्कर्श काढण्यात आला होता. भारतापाठोपाठ अफगाणिस्तान आणि सिरीया या युद्धग्रस्त देशांची गणना होत असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी हा सर्वेक्षण अहवाल फेटाळताना नमुना सर्वेक्षण खूपच लहान असल्याने त्यामध्ये संपूर्ण देशाच्या स्थितीचे प्रतिनिधीत्व नसल्याचे म्हटले आहे.
“द थॉमसन रॉयटर्स फौंडेशन’चे सर्वेक्षण ऑनलाईन आणि फोनवरून करण्यात आले होते. तसेच 26 मार्च ते 4 मे या कालावधीदरम्यान युरोप, आफ्रिका, अमेरिका, दक्षिण पूर्ण आशिया, दक्षिण आशिया आणि पॅसिफिक भूभागामध्ये करण्यात आले होते. अफगाणिस्तान, कॉंगो प्रजासत्ताक, पाकिस्तान, भारत आणि सोमालिया या महिलांसाठी धोकादायक म्हटल्या गेलेल्या देशांमध्ये 2011 साली करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचीच पुनरुक्ती या सर्वेक्षणामध्ये झाली आहे.