breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
भाजपची राष्ट्रवादीला छुपी मदत?; ‘त्या’ पत्रकाचा बोलविता धनी जनतेला ठाऊक
- शिवसैनिक पदाधिका-यांनी फोडली डरकाळी
- शहरप्रमुखांनी भाजपच्या पत्रकबाजीला दिले प्रत्युत्तर
पिंपरी ( महा ई न्यूज ) – मावळ लोकसभा मतदार संघातून भाजप राष्ट्रवादीला छुपी मदत करणार असून त्यांच्या मनामध्ये निवडणुकीच्या पराभवाचे शल्य आहे. त्यामुळे वैयक्तिक स्वार्थापोटी भाजप पदाधिका-यांनी मंत्री नितीन गडकरी यांना पत्रक दिले त्याचा बोलविता धनी जनतेला ठाऊक आहे, असे चोख प्रत्युत्तर देऊन शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर यांनी खासदार बारणे यांच्याविरोधातील भाजप पदाधिका-यांच्या खोडसाळपणाचा वचपा काढला आहे.
चिंचवडमध्ये खासगी कार्यक्रमास आल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपच्या नगरसेवकांनी पत्र देऊन खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीस विरोध असल्याचे सांगितले. बारणे यांच्या पराभवास भाजप कार्यकर्त्यास जबाबदार धरू नये, असेही पत्रकात म्हटले होते. त्याला शिवसेना पदाधिका-यांनी आज (सोमवारी) प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले.
शिवसेना पदाधिका-यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भाजप नगरसेवकांनी शिवसेनेची उमेदवारी कोणाला द्यावी, हा सल्ला देण्यापेक्षा महापालिकेत चाललेला भ्रष्टाचार, अनागोंदी कारभाराकडे लक्ष देवून तो कारभार सुधारावा, असा टोला लगावला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पक्षाचे नेते नेहमीच सरकारच्या चुकीच्या कामांना सरकारमध्ये राहून विरोध करत आहेत. जनतेच्या भावनांचा आदर करीत राहिले आहे. देशात शिवसेनेचा नाही, तर भाजपचा पंतप्रधान होण्यासाठी युती व्हावी, अशी हिंदुत्ववादी विचाराच्या मतदारांची इच्छा आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारास छुपी मदत करण्याचा स्पष्ट हेतू असल्यानेच खासदार बारणे यांच्या विरोधात भाजप पदाधिकारी, नगरसेवकांनी खोडसाळ भूमिका घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीत युती होईल किंवा नाही, अजूनही स्पष्ट नाही. युती झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना असे दोनच पर्याय मतदारांच्या समोर राहणार आहेत. त्यामुळे 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचे शल्य मनामध्ये ठेऊन वैयक्तिक स्वार्थापोटी ही पत्रकबाजी चालवली आहे. बारणे यांच्या नावाला विरोध करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपवासी झालेल्यांना युती झाल्यास पुन्हा पूर्वश्रामीच्या पक्षावर निष्ठा दाखवायची आहे. त्यातूनच अशा प्रकारची पत्रके नेत्यांना देऊन प्रसिद्धी मिळवली जात आहे, असे शिवसेना पदाधिका-यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.