बी.कॉम.च्या विद्यार्थ्यांना २० दिवस आधीच प्रवेशपत्रे
यंदा परीक्षा केंद्र शोधण्याची धावपळ थांबवण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न
परीक्षा जवळ आली असताना ऐनवेळी प्रवेशपत्राच्या दुरुस्तीसाठी आणि परीक्षा केंद्र शोधण्यासाठी विद्यार्थ्यांना करावी लागणारी धावपळ थांबवण्याचा प्रयत्न मुंबई विद्यापीठ करत आहे. यासाठी वाणिज्य पदवी शाखेच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या २० दिवस आधीच प्रवेशपत्र देण्यात आले आहे. तसेच ५व्या सत्राचे परीक्षा केंद्र ६व्या सत्रासाठीही कायम ठेवले आहे.
प्रवेशपत्रात चुका असल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. २० मार्चपर्यंत प्रवेशपत्रातील तपशील विद्यार्थ्यांना सुधारून मिळेल. तशी विनंती विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे केल्यास महाविद्यालयाने ती विद्यापीठाकडे पाठवायची आहे.
विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षी प्रवेश घेताना प्रवेश अर्जात भरलेला तपशील शेवटच्या सत्राचे प्रवेशपत्र, निकाल आणि पदवी प्रमाणपत्र यावर वापरला जातो. त्यात बदल झालेला असण्याची शक्यता असते. म्हणूनच विद्यार्थ्यांना प्रवेशपत्राच्या दुरुस्तीसाठी वेळ देण्यात आला आहे. तसेच प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांचे पाचव्या सत्राचे परीक्षा केंद्र छापण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना नव्याने पत्ता शोधण्याची गरज भासणार नाही व वेळ वाचेल.
परीक्षा ३ एप्रिलपासून
बी.कॉम.ची सहाव्या सत्राची परीक्षा ३ एप्रिलपासून सुरूहोत आहे. यासाठी ५७ हजार विद्यार्थ्यांना ई-सुविधा अॅप तसेच विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील लॉग-इनमध्ये २० दिवस आधीच प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.