पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यास जबाबदार अधिका-यावर कारवाई करा
- पदाधिका-यांचे पाणी पुरवठा विभागावर ताशेरे
- अधिका-यांचा पुन्हा घुमजाव करण्याचा प्रयत्न
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शहरात मानवनिर्मित पाणीटंचाई केली जात असतानाच पालिका प्रशासनाने मात्र पाणी गळती आणि धरणातून अपुरा पाणी पुरवठा होत असल्याची कारणे देऊन सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांना वेड्यात काढले होते. त्यावर ही यंत्रणा सुरळीत करण्यासाठी पाणी पुरवठा विभागाला आठ दिवसांची मुदत दिली होती. तरीही, विस्कळीत पुरवठा होत असल्याने त्याची आढावा बैठक आज बुधवारी (दि. 17) घेण्यात आली. त्यातही पाणी पुरवठा विभागावर नगरसेवकांनी ताशेरे ओढले. यापुढे विस्कळीत पाणी पुरवठ्याला जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी, कर्मचा-यावर थेट कारवाई करण्यात यावी, अशा सूचना पदाधिका-यांनी केल्या आहेत.
शहराला पाणी पुरवठा करणा-या पवना धरणात मुबलक पाणी असताना शहरात मात्र, टंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर पाणी पुरवठा विभागाला पंधरा दिवसांत पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी देखील तसे आदेश या विभागाला दिले होते. आठ दिवस उलटल्यानंतर त्याची आढावा बैठक आज घेण्यात आली. बैठकीत पदाधिका-यांनी पाणी पुरवठा विभागातील अधिका-यांवर निशाणा साधला. प्रभागानुसार होणा-या पाणी पुरवठ्याचे नियोजन विचारण्यात आले. पाणी गळतीची माहिती विचारण्यात आली. मात्र, कागदोपत्री घोडे नाचवत अधिका-यांनी पुन्हा सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांना घुमजाव केले. त्यावर पदाधिका-यांनी शहरातील कोणत्याही भागात पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यास तेथील संबंधित अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना पदाधिका-यांनी दिल्या आहेत.
बैठकीला महापौर राहूल जाधव, आयुक्त श्रावण हार्डीकर, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, उपमहापौर सचिन चिंचवडे, विधी समिती सभापती मोना कुलकर्णी, नगरसेविका सुजाता पालांडे, नगरसेवक, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.