‘ज्येष्ठांचा अपमान करणारं कारटं लोकसभेत नको’, सुजय विखेंवर आव्हाडांची टीका
अहमदनगर – भाजपच्या जाहीर सभेतील या गोंधाळावरून जितेंद्र आव्हाडांनी सुजय यांना लक्ष्य केलं. ‘ज्येष्ठांचा अपमान करणारं कारटं लोकसभेत जाता कामा नये, त्याऐवजी नम्रता आणि सज्जनता याचं एक उदाहरण म्हणून समोर असलेले आमदार संग्राम जगताप यांना लोकसभेत बहुमताने निवडून द्या’ असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केलं.
आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित वाळकी इथे जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी भाजप उमेदवार सुजय विखेंवर टीका केली. ज्येष्ठांचा अपमान करणारं कारटं लोकसभेत नको अशा शब्दात आव्हाडांनी सुजय विखेंवर टीका केली.
नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र, व्यासपीठावर ज्या घडामोडी घडल्या त्यामुळे मोदींच्या भाषणापेक्षाही जास्त चर्चा खासदार दिलीप गांधी यांच्या नाराजीची आहे. त्याचबरोबर सुजय विखे यांनी प्रमुख आणि जेष्ठ नेत्यांना भाषण आटोपतं घेण्यासाठी प्रयत्न केले याचीदेखील सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
‘साखळाई पाणी योजना गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून यापूर्वी भाजपाचे नाथाभाऊ खडसे यांनी ही योजना पूर्ण करण्याच आश्वासन दिलं आहे. मात्र, पाच वर्ष सरकार सत्तेत असतानाही योजना फडणीस यांना पूर्ण करता आली नाही आणि आता ऐन निवडणुकीच्या काळात केवळ याच मुद्द्यावर प्रचार करून मतं मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची सभा वाळकी येथे घेण्याचा घाट घातला आहे’ अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
‘पण 2019मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असल्याने आम्ही त्या प्रश्नावर योग्य प्रकारे जनतेला न्याय देऊन त्यासाठी कोणतंही आंदोलन करण्याची गरज जनतेला भासणार नाही’ अशी ग्वाही जयंत पाटील यांनी यावेळी दिली.