गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून सामान्य माणसाला न्याय द्या – पालकमंत्री गिरीष बापट
चिखली पोलिस स्टेशनचे उद्घाटन
पिंपरी ( महा ई न्यूज ) – नागरिक हा पोलिसाचा मित्र असावा, पोलिस ठाण्यात आल्यानंतर सामान्य माणसाला भिती न वाटता, त्याला आधार वाटायला हवा. त्यामुळे पोलिसाची चांगली कामे निश्चित होवून सामान्य माणूस पोलिसाच्या मदतीने धावून येईल, तसेच गुन्हेगार संख्या शहरात फार कमी आहे. माणूस एकच असतो पण त्याच्याकडून अनेक गुन्हे घडत असतात. त्या एकाच्या मुसक्या आवळल्यास निश्चितच शहरातील गुन्हेगारी कमी होवून सामान्य माणसाला रात्री-अपरात्री शहर असुरक्षित वाटणार नाही. त्याना न्याय देण्याचे काम पोलिसांनी करावे, असे आवाहन पालकमंत्री गिरीष बापट यांनी व्यक्त केले.
चिखली पोलीस स्टेशनचे उद्घाटन पालकमंत्री गिरीष बापट यांचे आज (बुधवारी) करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापाैर राहूल जाधव, पोलीस आयुक्त आर.के.पद्यनाभन, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्यासह नगरसेवक, पोलीस अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते. याप्रसंगी अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी आयुक्तालयाच्या समस्यांची गा-हाणी मांडली.
पालकमंत्री बापट म्हणाले की, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विविध अडीअडचणीबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक यांच्यासोबत मंत्रालयात बैठक लावून अपुरा कर्मचारी वर्ग, वाहन संख्या, बॅरिकेट यासह कार्यालयीन साधनसामुग्री विविध अडीअडचणी देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. मात्र, सरकारी कामात परस्थिती अधिक किचकट असल्याने त्याला थोडा वेळ लागेल, परंतू, याविषयी पोलिसांची गरज आेळखून कामकाज सुरळीत करण्यासाठी मदत करण्यात येईल. याशिवाय पोलिसांचे आरोग्य, त्यांच्या घराचा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासह सेवानिवृत्त पोलीसांचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजप सरकार आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिल, अशीही ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
महापाैर राहूल जाधव म्हणाले की, पिंपरी चिंचवडकर नागरिक सुखी, समाधानी आणि सुरक्षित राहिल यासाठी पोलिसांनी काम करावे, चिखली परिसरात अनेक भयानक घटना घडल्या आहेत. नागरिकांना सुरक्षित वातावरण आवश्यक आहे. त्यामुळे पोलिसांना पोलिस आयुक्तालयास महापालिकेच्या माध्यमातून मदतीचे आश्वासन दिले.
आयुक्त आर.के.पद्यनाभन म्हणाले की, शहरात अपु-या पोलीस कर्मचा-यांच्या बळावर जास्तीत जास्त काम आम्ही करतोय, यापुर्वी नागरिकांची तक्रार घेण्यास विलंब लावला जात असे. काही तक्रारी दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतू, सध्यस्थितीत आयुक्तालयात किमान दोनशे लोक दररोज भेट देवून त्यांच्या अडअडचणी मांडत आहेत. प्रत्येक तक्रारीवर त्यांना मदत आम्ही करणार आहोत. यापुढे नागरिकांनी पोलिसांची मदत मागितल्यास केवळ दहा ते पंधरा मिनिटात पोलिस घटनास्थळी हजर होतील, त्यामुळे तुम्ही आमच्याकडे येवू नका, आम्ही तुमच्या येवून नागरिकांना तत्पर सेवा देणार आहोत. असे ते म्हणाले.