breaking-newsराष्ट्रिय
केरळमध्ये पावसाचे थैमान; 19 जणांचा मृत्यू
थिरूवनंतपूरम् – केरळमध्ये मागील दोन दिवस पावसाने अक्षरश: थैमान घातले. त्यामुळे मागील 24 तासांत घडलेल्या विविध दुर्घटनांत 19 जण मृत्युमुखी पडले. पावसाने दिलेल्या तडाख्यानंतर आणखी 18 जण बेपत्ता असल्याचे समजते. पावसामुळे अनेक जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झाले.
नैसर्गिक आपत्तीने राज्यभरात मालमत्तेची आणि पिकांचीही मोठी हानी झाल्याची माहिती सरकारी सुत्रांकडून देण्यात आली. काही जिल्ह्यांमध्ये 18 जूनपर्यंत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्यांत केरळ सरकारने सतर्कतेचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री पिनरयी विजयन स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. त्यांनी पावसाने थैमान घातलेल्या भागांत तातडीने मदतकार्य हाती घेण्याचा आदेश प्रशासनाला दिला आहे.