breaking-newsमुंबई

एनडीएतून बाहेर पडल्यास शिवसेनेशी हातमिळवणी करण्यास तयार – राजू शेट्टी

मुंबई – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी शिवसेनेबरोबर हातमिळवणी करण्याची तयारी दर्शवली आहे. अर्थात, त्यासाठी त्यांनी शिवसेनेने भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र आणि राज्यातील एनडीए सरकारांमधून बाहेर पडण्याची अट पुढे केली आहे.

महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी भागांत शिवसेनेचे चांगले अस्तित्व आहे. त्यामुळे त्या पक्षाचा पाठिंबा आम्हाला लाभदायी ठरेल, अशी भूमिका शेट्टी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना मांडली. देशातील निम्म्यापेक्षा अधिक नागरिक ग्रामीण भागांत राहतात. मात्र, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे त्यांच्या हितसंबंधांना बाधा पोहचत आहे. एनडीए सरकार शेतकरी आणि ग्रामीण भारताच्या हिताचे निर्णय घेईल, असे मला वाटत होते.

मात्र, निराशा झाल्याने आम्ही एनडीएमधून बाहेर पडलो, असे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना दिलेली आश्‍वासने पाळण्यात केंद्र सरकारला अपयश आल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटना मागील वर्षी केंद्रातील एनडीए आणि राज्यातील महायुतीमधून बाहेर पडली. त्यानंतर मार्चमध्ये शेट्टी यांनी शेतकऱ्यांशी संबंधित मुद्‌द्‌यांवर कॉंग्रेससमवेत कार्य करण्याची घोषणा केली होती. आता त्यांनी मांडलेल्या नव्या भूमिकेमुळे शिवसेनेच्या पुढील पाऊलांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पुढील निवडणुका स्वबळावर लढण्याची ठाम भूमिका शिवसेनेकडून मांडली जात आहे.


Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button