उजनीचे पाणी वाचविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन
इंदापूर – ”इंदापूर तालुक्यातील हक्काच्या पाण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रपंच उध्वस्त होण्यापासून वाचविणे गरजेचे आहे. मराठवाड्याला इंदापूरकरांच्या हक्काचे पाणी देण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी मोठे जनआंदोलन करण्याची गरज निर्माण झाली आहे’, असे प्रतिपादन आमदार दत्तात्रेय भरणे यांनी केले.
राजकारणात तुमची चूल वेगळी आहे, आमची चूल वेगळी आहे. पण राजकारण बाजूला ठेवून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी एकत्रित येण्याचे आवाहनही माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता आमदार भरणे यांनी केले.
पळसदेव (ता. इंदापूर) येथे नीरा-भीमा स्थिरिकरण प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला पाणी देण्याच्या विरोधात येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ठिय्या आंदोलन करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, खरेदी-विक्री संघाचे सभापती अशोक चोरमले, अमोल भिसे, शशीकांत तरंगे, नगरसेवक श्रीधर बाब्रस, पोपट शिंदे, डी. एन. जगताप, प्रदीप काळे, अशोक घोगरे आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, ”खडकवासला कालव्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. पुण्यातील सगळे आमदार कालव्याच्या पाण्यासाठी एकवटले असून, त्यांनी शहरातील पाणी कपात रद्द करण्यासाठी अनाधिकृतपणे पंपहाऊसचे टाळे तोडून पाणी उपसले आहे. यामुळे कर्मयोगी कारखान्याचे अध्यक्ष (हर्षवर्धन पाटील) हेही या समितीचे सदस्य आहेत. त्यांनी सोमवारी होणाऱ्या बैठकीस हजर राहून शेतकऱ्यांच्या पाण्याबाबत त्यांनीही आमच्याबरोबर आग्रही मागणी मांडावी.”